उपबाजार

चिचोंडी पाटील उपबाजार

चिचोंडी पाटील येथे अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजार आवाराचे भूमिपूजन कार्यक्रम संपन्न झाला.

व्यावेळी यासपीठावर जलसंपदा मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री. राधाकृष्ण विखे पाटील साहेब , आमदार शिवाजी कर्डीले, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, माजी आमदार बबनराव पाचपुते, भानुदास कोतकर, अक्षय कर्डीले, दिलीपराव भालसिंग, अविनाश घुले, सचिन जगताप, भाऊसाहेब घोटे, सुरेंद्र गांधी, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था मंगेश सुरवसे, शुभांगी गौंड, हरिभाऊ कर्डीले आदी मान्यवर उपस्थित होते.

सन १९५४ मध्ये सुरू झालेली अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समिती सातत्याने प्रगतीचा आलेख राखत असून शेतकऱ्यांच्या हक्काचे ठिकाण म्हणून नावलौकिकास आली आहे. नेप्ती व चिचोंडी पाटील येथे समितीच्या माध्यमातून आधुनिक व्यवस्था उभारली जात आहे. पणन विभाग शेतकरी हितासाठी अनेक योजना राबवत असून कृषी मालाला जी.आय. टॅग देण्यात आला आहे. निर्यातीसाठीची सुविधा निर्माण करण्याचे काम सुरू आहे. अहिल्यानगर बाजार समितीलाही निर्यात सुविधा देण्यात येणार आहे. जिल्ह्यात फळपिकांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते. या फळपिकांची निर्यात होऊन शेतकऱ्यांना अधिक फायदा व्हावा यासाठी शेतकऱ्यांच्या मुलांना निर्यातीचे प्रशिक्षण देण्याची व्यवस्था पणन मंडळाकडून करण्यात येईल. राज्यातील शेतकऱ्यांचा भाजीपाला दुबईच्या बाजारपेठेत पोहोचविण्याचीही व्यवस्था करण्यात येणार आहे.

केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून ई-नाम व्यवस्था निर्माण करण्यात आली असून १३३ बाजार समित्यांना त्याद्वारे जोडण्यात आले आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना राज्य, देश व जगातील बाजारभाव त्वरित मिळू शकतात. २ हजार ५०० कोटी रुपयांच्या मुख्यमंत्री कृषी उत्पन्न बाजार समिती बळकटीकरण योजनेतून बाजार समित्यांना निधी दिला जाणार आहे. कल्याणजवळील बापगाव येथे १२२ एकरांवर अत्याधुनिक निर्यात व्यवस्था उभारली जात असून त्याचा मोठा लाभ शेतकऱ्यांना होईल असे यावेळी सांगितले.

या कार्यक्रमात उमेद अंतर्गत महिला बचतगटांना कर्जाच्या धनादेशांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे पदाधिकारी, अधिकारी, नागरिक व महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

नेप्‍ती उपबाजार आवार

कृषि उत्पन्न बाजार समिती,अहिल्यानगरचे नेप्ती उपबाजार आवाराची वैशिष्टे

  • शेतक-यांचा शेतमाल मार्केटमध्ये आल्याबरोबर इलेक्ट्रानिक काट्यांवर वजन केले जाते.
  • इलेक्ट्रानिक काट्यांवर वजन केलेनंतर त्याची मापाडी यांचे मार्फ़त व्हेंडींग मशिनद्वारे नोंद होवुन तयार झालेली काटापट्टी नोंदीचा एस.एम.एस शेतकरी यांचे मोबाईलवर जातो.
  • त्यामुळे शेतकरी वर्गाला आपल्या शेतमालाचे झालेले वजन बरोबर आहे की नाही याची खात्री होते.व जर वजनात काही तफ़ावत दिसल्यास तात्काळ आडतदार यांचेशी संपर्क साधुन झालेली चुक सुधारणा करणेची संधी मिळते. त्यामुळे शेतकरी यांचे कोणतेही नुकसान होत नाही.
  • संगणकीकृत काटापट्टी शेतकरी/आडतदार यांना दिली जाते.
  • शेतकरी/व्यापारी/आडतदार यांना सुसज्ज अशी पार्किंग व्यवस्था केलेली आहे.
  • बाजार आवारात शेतकरी/ व्यापारी यांचे सोयीसाठी 50 टनी क्षमतेचे 2 भुईकाटे तर 80 टनी क्षमतेचा 1 भुईकाटा बसविलेला आहे.सदर भुईकाटे दरवर्षी पडताळणी करुन घेतले जातात. त्यामुळे शेतमालाचे बिनचुक वजन होते.(सदरचा भुईकाटा शेतक-यांसाठी सक्तीचा नसुन एकाच शेतकरी यांचा शेतमाल गाडीत असेल तर किंवा शेतकरी स्वत;चे समाधानासाठी वजन करु शकतात.)
  • शेतक-यांचे प्रत्येक गोणीचे वजन करणेसाठी प्रत्येक गाळ्यांवर/आडतीवर इलेक्ट्रानिक काटे बसविलेले असुन तेथे मापाडी यांची नेमणुक केली आहे.त्यांचेकडून शेतक-यांच्या प्रत्येक गोणिचे बिनचुक वजन केले जाते.
  • नेप्ती उपबाजार आवार मार्केट यार्ड मधिल सर्व रस्ते कोंक्रीटीकरण केलेले आहेत.
  • नेप्ती उपबाजार आवारमधिल सर्व घटकांना (RO) आर ओ चे स्वच्छ पिण्याचे पाण्याची व्यवस्था केलेली आहे.तसेच स्वच्छतागृहांची उभारणी केली आहे.
  • नेप्ती उपबाजार आवाराकरीता स्वतंत्र्य विदयुत डी.पी घेवुन संपुर्ण यार्डमध्ये विद्युत व्यवस्था केलेली आहे.
  • नेप्ती उपबाजार आवारात सुचना व माहीती देणेसाठी ध्वनिक्षेपक बसविलेले आहेत.
  • नेप्ती उपबाजार आवारात शेतक-यांना शेतमाल घेवुन आल्यावर मुक्कामासाठी अल्पदराने सुसज्ज शेतकरी निवासाची व्यवस्था केलेली आहे.
  • नेप्ती उपबाजार आवारात शेतमाल घेवुन आल्यावर राज्यातील व राज्याबाहेरील बाजारभाव शेतक-यांना समजणेसाठी डिजीटल बोर्डची व्यवस्था केलेली आहे.